सावरकर जयंतीनिमित्त पाली येथे हिंदू महासभेच्या शाखेची स्थापना; २२ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
पाली (रायगड) :स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पाली येथे हिंदू महासभेच्या नव्या शाखेची स्थापना करण्यात आली. या वेळी २२ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. सावरकर विचारांचा प्रसार, हिंदुत्वनिष्ठांचे संघटन आणि सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पाली येथील अजित जोशी यांच्या “हॉटेल वैष्णवी” येथे आयोजित कार्यक्रमात प्रदेश पदाधिकारी सौ. आदिती जोशी आणि श्री. अजित जोशी यांच्या पुढाकारातून शाखेची स्थापना करण्यात आली. या उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणारे प्रदेश पदाधिकारी श्री. नितीन शुक्ल यांचे उपस्थितांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदू महासभेचे मुंबई पदाधिकारी श्री. माळी यांनी सहकाऱ्यांसह पाली येथे भेट देत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात श्री. नितीन शुक्ल यांनी हिंदू महासभेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि संघटनेची गरज याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. सौ. आदिती जोशी यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्य, विज्ञाननिष्ठ विचारसरणी, राष्ट्रभक्ती, समाजकारण, राजकारण आणि नैतिक मूल्यांचा आढावा घेतला.
अजित जोशी यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या एकत्रीकरणाचे आणि सातत्यपूर्ण कार्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर विविध कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप वृक्षारोपणाने करण्यात आला.
यावेळी डॉ. पुराणिक मॅडम, रविंद्र द्रविड, धनंजय गद्रे गुरुजी, सुनिल कुलकर्णी, मनोहर जांभूळपाडा, सिद्धेश्वर लाड, वैदेही मराठे, रामभाऊ घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
“सावरकरांचे विचार प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळाली,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










