डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवतीचे बाळ दगावले; हिंगोलीतील धक्कादायक प्रकारामुळे संताप
हिंगोली :राज्यात इंधन टंचाई नसल्याचे दावे सरकारकडून केले जात असतानाच हिंगोली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण देत वेळेत सेवा न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरातील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला. मात्र “रुग्णवाहिकेत डिझेल नाही” असे सांगून सेवा देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तब्बल दीड ते दोन तास वाट पाहूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर कुटुंबीयांनी खासगी वाहनाची व्यवस्था करून महिलेला हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांना बाळ वाचवता आले नाही.
“आम्ही गरीब माणसं आहोत. अचानक खासगी गाडी कुठून आणायची? वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर बाळ वाचलं असतं,” अशी व्यथा महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. कुटुंबीयांनी स्वतः ८५० रुपयांचे डिझेल भरून वाहनाची व्यवस्था केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी “ही त्या बाळाची हत्या आहे” असा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्याचे संकेत दिले आहेत. “डिझेल नसल्यामुळे रुग्णवाहिका नाकारली गेली असेल तर ते अत्यंत गंभीर आहे. वस्तुस्थिती तपासून दोषींवर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, रुग्णवाहिका व्यवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429










