ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास राज्यभर आंदोलन; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्य सरकारला स्पष्ट इशारा देत ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची भूमिका ठामपणे मांडली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेताना मूळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. जर कोणत्याही दबावाखाली ओबीसी समाजाच्या आरक्षण हक्कांवर गदा आणली गेली, तर संपूर्ण राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.
दबावाखाली निर्णय घेऊ नका
डॉ. तायवाडे यांनी ‘सगे सोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू असल्याचा दावा करत सरकारने कोणत्याही विशिष्ट गटाच्या दबावाला बळी पडू नये, असे आवाहन केले. ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असून त्यात कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरक्षणाच्या राजकारणाला पुन्हा वेग आला असून सरकार या संवेदनशील प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










