माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा वीज वितरण कंपनीवर धडक मोर्चा:-
जि.अमरावती,ता. चांदुर :दि. 23 जून :-छत्रपती शिवाजी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या वीज खंडित प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः महिलांना व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
लोकप्रिय नगरसेविका कल्पनाताई लांजेवार यांच्या पुढाकारातून आणि माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला व नागरिकांनी चांदूर रेल्वे येथील वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत शहरातील वीज पुरवठा सुरळीत का ठेवला जात नाही, असा सवाल उपस्थित केला.
“मेंटेनन्सच्या नावाखाली केवळ कागदोपत्री कामे सुरू आहेत का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी देखभाल कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचाही आरोप केला.
छत्रपती शिवाजी नगर परिसरातील महिलांनी वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची भावना व्यक्त केली. रात्रीच्या वेळी अंधारामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनाचा वाढता रोष पाहता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अखेर आंदोलकांसमोर नमते घेत, शहरातील तांत्रिक अडचणी दूर करून पुढील तीन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी वीरेंद्रभाऊ जगताप यांनी इशारा देत सांगितले की, “दिलेल्या मुदतीत समस्या सुटली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
पत्रकार :विजय रणभोर, पुणे
9359280220.







