निंगनूर ते शंकरवाडी-चिंचवाडी रस्त्याची दुरवस्था; नागरिक व विद्यार्थ्यांचा संताप:-
जि.यवतमाळ,ता.उमरखेड :दि.22 जून :-उमरखेड तालुक्यातील निंगनूर ते शंकरवाडी आणि चिंचवाडी या मुख्य संपर्क रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिक, शेतकरी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावरून दररोज अनेक नागरिकांची तसेच विविध वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याची अवस्था खराब झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून किरकोळ अपघातांच्या घटनाही वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने त्यांना वेळेवर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन घसरण्याच्या घटना घडत आहेत.
याशिवाय रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही या रस्त्यावरून जाताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
निंगनूर ते शंकरवाडी-चिंचवाडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ, विद्यार्थी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.










