हॉटेलमध्ये मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
मुंबई : राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, कॅन्टीन आणि अन्नप्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
ग्राहकांना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी मोफत उपलब्ध करून देणे ही प्रत्येक खाद्य व्यवसायाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी संबंधित आस्थापनांनी “पिण्यायोग्य पाणी मोफत उपलब्ध आहे” असा फलक ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक राहणार आहे. या निर्देशांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेबाबत राज्यभरात कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुंढे यांनी ठामपणे सांगितले. तसेच खाद्य व्यवसायांनी स्वच्छता, परवाना अटी, अन्नसाठवणूक आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होणार असून, राज्यातील खाद्य व्यवसायांमध्ये अधिक पारदर्शकता आणि शिस्त निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









