डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे


‘डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

जळगाव | प्रतिनिधी

डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Institute of Management and Research College, Jalgaon येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले.

सत्रादरम्यान स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीची माहिती दिली. ओटीपीद्वारे फसवणूक, क्यूआर कोडद्वारे फसवणूक, एआय व्हॉइस कॉलद्वारे फसवणूक, ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या फसवणुकीच्या पद्धती प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या.

ऑनलाइन व्यवहार करताना OTP, PIN किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मजबूत पासवर्ड आणि 2FA वापरण्याचे महत्त्वही सांगण्यात आले.

यावेळी क्विक हील फाउंडेशनतर्फे विकसित Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या अॅपच्या वापराबाबत आणि डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सत्र प्रभावी ठरले. या उपक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिनिधी सोमेश मुळे


53
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!