रा. ति. काबरे विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन
एरंडोल : रा. ति. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, एरंडोल येथे विद्यार्थ्यांना सायबर क्राईम तसेच सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि डिजिटल माध्यमांचा सुरक्षितपणे वापर करण्याबाबत माहिती देणे हा होता.
या मार्गदर्शन कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती व पासवर्ड सुरक्षित ठेवणे, ऑनलाइन फसवणूक टाळणे तसेच सायबर गुन्हा घडल्यास योग्य ती खबरदारी घेण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेविषयी माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली.
कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस. एस.राठी सर, उपमुख्याध्यापक श्री. पी.एच. नेटके सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. एस. बी. चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
प्रतिनिधी सोमेश मुळे







