सिल्लोडमध्ये विहीर खचून दोन सख्ख्या भावांसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; धानोरा गावावर शोककळा
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर):
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धानोरा (ता. सिल्लोड) येथे एक अतिशय भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. विहिरीत उतरून मोटर पंप बसवत असताना अचानक विहीर खचल्याने ढिगाऱ्याखाली दबून बापलेकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव काकडे आणि त्यांची दोन मुले विहिरीच्या कामासाठी आत उतरले होते. रात्री साडे नऊच्या सुमारास काम सुरू असताना अचानक विहिरीची माती खचली. यात बाजीराव, आजिनाथ आणि शाम हे तिघेही ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
कष्टाळू कुटुंबातील तीन आधारस्तंभ हरपले:
बाजीराव काकडे, आजिनाथ काकडे आणि शाम काकडे अशी मृतांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील तीन कर्त्या पुरुषांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या भीषण अपघातामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आज होणार अंत्यसंस्कार:
कष्टाळू आणि शांत स्वभाव असलेल्या या कुटुंबातील तिन्ही आधारस्तंभ गेल्याने संपूर्ण धानोरा गाव हादरून गेले आहे. आज या तिघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








