आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त; तरीही इंधन दर कायम, अंजली दमानिया यांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरूनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात न झाल्याने प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी सरकार महसूल वाढविण्याला प्राधान्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दमानिया म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की देशात इंधनाचे दर वाढवण्यासाठी सरकारला विलंब होत नाही. मात्र आता कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल 115 डॉलरवरून सुमारे 75 डॉलरपर्यंत खाली आला असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या दरकपातीचा लाभ सामान्य नागरिकांना कधी मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, “तेल महागलं की जनतेच्या खिशावर भार टाकायचा आणि स्वस्त झालं की सरकारच्या तिजोरीचा फायदा करून घ्यायचा, ही भूमिका योग्य नाही. महागाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसत असून त्यांना दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची आहे.”
इंधन दरांचा थेट परिणाम वाहतूक, शेती, उद्योग आणि दैनंदिन जीवनावरील खर्चावर होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत तातडीने कपात करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
— पत्रकार उमेश कुलकर्णी
मो. 9822548429






