पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार; शाळांना सुट्टी, १० गाड्या रद्द
पालघर :गेल्या २४ तासांत पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून विजेचे खांब कोसळल्याने शेकडो गावांचा वीजपुरवठा सुमारे १६ तासांपासून खंडित आहे.
डहाणू आणि तलासरी तालुक्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून बोईसर–पालघर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे १० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने पालघरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429






