१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; महाराष्ट्राच्या नावावर विश्वविक्रम


१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; महाराष्ट्राच्या नावावर विश्वविक्रम

नवी मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६’मध्ये १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत महाराष्ट्राच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद केली.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला. एकाच वेळी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्याची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशमूर्तीच्या भव्यतेपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले. गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“गणराया ही बुद्धीची देवता आहे. आपल्या संस्कृतीत पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सृष्टीची निर्मिती करणाऱ्या पंचमहाभूतांचे रक्षण झाले, तरच मानवी जीवन सुरक्षित राहू शकते. मूर्ती लहान असो किंवा मोठी, भक्ती सारखीच असते,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कृत्रिम रंगांमुळे जलस्रोतांचे होणारे नुकसान टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. ईश्वराचा आशीर्वाद हा मूर्तीच्या आकारावर नव्हे, तर पर्यावरण आणि समाजासाठी आपण किती निःस्वार्थपणे योगदान देतो यावर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या परीक्षकांनी विश्वविक्रमाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यशाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री गणेश नाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!