राज्य सरकारचा मोठा निर्णय: ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पुणे: राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. आगामी ३० जूनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जमाफीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, या निर्णयामुळे लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद आणि पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ३० जूनची डेडलाईन निश्चित केल्यामुळे आता प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना हा मोठा आधार ठरणार आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










