पुण्यातील १०१ महापालिका शाळांना रविवारपर्यंत सुट्टी; वारकऱ्यांच्या निवासासाठी पालिकेचा मोठा निर्णय
पुणे : संततधार पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे देहू व आळंदी परिसरात अडकलेल्या हजारो वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या १०१ शाळा वारकऱ्यांच्या निवासासाठी तात्पुरत्या आश्रयस्थळांमध्ये (शेल्टर होम) रूपांतरित करण्यात आल्या असून, या सर्व शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महापालिकेने या शाळांमध्ये वारकऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची तसेच अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था केली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याने आणि नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने अनेक वारकरी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा तसेच वारकऱ्यांच्या सोयीचा विचार करून संबंधित १०१ महापालिका शाळांमधील शैक्षणिक कामकाज रविवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






