भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यभर संवाद दौरा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भरती परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक तसेच संबंधित हितधारकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
या टास्क फोर्सचा संवाद कार्यक्रम १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यातील सर्व सहा विभागांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. विविध ठिकाणी प्रत्यक्ष संवाद साधून भरती परीक्षांबाबतच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत.
संवाद दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
पुणे विभाग – १२ सप्टेंबर
नागपूर विभाग – १६ सप्टेंबर
अमरावती विभाग – १७ सप्टेंबर
छत्रपती संभाजीनगर विभाग – २१ सप्टेंबर
कोकण विभाग – २९ सप्टेंबर
नाशिक विभाग – ३० सप्टेंबर
भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी उमेदवारांच्या प्रत्यक्ष अनुभवांना या प्रक्रियेत महत्त्व दिले जाणार आहे. परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, गैरप्रकारांना प्रतिबंध, तांत्रिक व्यवस्था, परीक्षा केंद्रांची सुरक्षा तसेच उमेदवाराभिमुख उपाययोजनांबाबत हितधारकांकडून सूचना घेतल्या जातील.
या संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना, अडचणी आणि अभिप्रायांचा सखोल अभ्यास करून भरती परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला आवश्यक सुधारणांबाबत शिफारशी सादर केल्या जाणार आहेत.
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या दृष्टीने हा संवाद कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार असून, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा प्रत्यक्ष उमेदवारांच्या अनुभवांच्या आधारे करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी







