टाकरखेडा गावात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती
सोमेश मुळे जळगाव| प्रतिनिधी
डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने ताकरखेडा गावात आज सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आली.
या कार्यक्रमात गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीबाबत माहिती देण्यात आली. संशयास्पद फोन कॉल्स, मेसेज, लिंक तसेच ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याची माहितीही देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांना डिजिटल व्यवहार सुरक्षितपणे करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती उपक्रमात स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, जय ठाकूर आणि राहुल चोपडे यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सर यांचे मार्गदर्शन लाभले. गावातील नागरिकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली.







